पुणे : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. गावाच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी कवडीमाळवाडी येथे पाण्याच्या टाकीसाठी 4 गुंठे जागा ग्रामपंचायतीतर्फे अधिकृतरीत्या खरेदी करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वीच या जागेच्या खरेदीचा व्यवहार ग्रामपंचायतीने नायर कुटुंबियांसोबत पूर्ण केला होता. दरम्यान, सध्या या परिसरातील जमिनींचे भाव प्रति गुंठा ३० लाखांपेक्षा अधिक असतानाही दिलेला शब्द पाळत नायर कुटुंबीयांनी गावाच्या पाणी योजनेसाठी सहकार्य केले. ग्रामीण सामाजिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण ठरल्याने आज नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चितरंजन गायकवाड यांच्या हस्ते नायर कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
जागा खरेदी प्रक्रियेसाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदारांचेही या प्रसंगी आभार मानण्यात आले.
योजनेच्या पूर्णत्वामुळे गावातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा शक्य होईल, असा विश्वास नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चितरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला. ही योजना गावाच्या सर्वांगीण विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
